Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 16 June 2016

रचनावादाचं शास्त्र आत्मसात करायला हवं -रमेश पानसे

रविवार, 22 मे 2016 - 01:30 AM IST

Share Link:
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=N769KN
Tags: saptarang, ramesh panse

*जिल्हा परिषदांच्या शाळांमधून रचनावादी शिक्षणपद्धती आता मूळ धरू लागली आहे. क्रमिक पुस्तकांच्या स्वरूपात बदल, मूल्यवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी आदींच्या माध्यमातून ती रुजत आहे. मूल्यवर्धनाचे कार्यक्रम शाळांमधून राबवणं हे या शिक्षणपद्धतीमधलं पुढचं पाऊल म्हणता येईल. महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या काही शाळांमधून पुढच्या महिन्यापासून (जून २०१६) मूल्यवर्धनाचे कार्यक्रम पथदर्शी स्वरूपात सुरू होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर या रचनावादी शिक्षणपद्धतीविषयी...*



मध्यंतरी माझ्याकडं एका शहरातले एका क्‍लबचे प्रमुख भेटायला आले. मागं पडलेल्या शाळांमधल्या काही निवडक शिक्षकांसाठी त्यांना प्रशिक्षण घ्यायचं होतं. तसं ते ठरवून आले होते. ते म्हणाले ः ‘‘मी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलून, त्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षणासाठी बोलावणार आहे’’ नकारार्थी मान हलवली. मी त्यांना सुचवलं ः *‘‘मागं पडलेल्या शाळांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण द्यायचं असेल, तर तुम्ही तथाकथित मान्यवर मराठी शाळा आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा निवडा. सध्याच्या परिस्थितीत त्याच ‘मागासलेल्या’ शाळा आहेत, असा माझा कयास आहे.’’*

आज बहुतांश खासगी मराठी शाळांतून आणि इंग्लिश माध्यमांच्या शाळांतून, ६० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेली आणि त्याहीपूर्वी ६० वर्षं जन्माला आलेली, तत्कालीन मानसशास्त्राचा बळकट पाया असलेली वर्तनवादी विचारसरणी अजूनही त्यांच्या व्यवहारात टिकून आहे. पठडीबद्ध, बंदिस्त आणि थोड्यांना यश देऊन, अनेक मुलांना वेगवेगळ्या स्तरांवरचे अपयशी ठरवणारी अशी ही जीवनपद्धती अजूनही अवलंबली जात आहे. या पद्धतीची भलामण करणारे लोक आज जगभरातच फारसे उरलेले नाहीत. फक्त, जुना चर्मरोग जसा खूप काळ टिकतो, तशी ही पद्धती काही शाळांतून टिकून आहे. काही लोक ती अट्टहासानं, तर काही लोक, शालेय शिक्षक व व्यवस्थापन यांच्या सोईसाठी, तर अन्य काही लोक आर्थिक स्वार्थापोटी या जुन्या पद्धतीलाच चिकटून आहेत. त्यामुळं साहजिकच अशा शाळा त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यात कमी पडत आहेत.

या खासगी शाळांच्या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शेकडो शाळा आपापल्या विद्यार्थ्यांना शिकतं करण्यात आणि आनंदी करण्यात उठून दिसत आहेत.
मी अलीकडं जिल्हा परिषदांच्या शाळांच्या संपर्कात असतो; त्यांच्या शिक्षकांशी बोलतो, त्यांचे वर्ग व विद्यार्थी न्याहाळतो. माझ्या असं लक्षात आलं आहे, की जिल्हा परिषदांचे बरेचसे शिक्षक आणि शिक्षिका, स्वयंप्ररणेनं, प्रत्यक्ष वर्गांमधल्या शिकण्या-शिकवण्याच्या व्यवहारात खूप मोठे, उपयुक्त असे बदल करत आहेत. त्यात त्यांची मानसिक गुंतवणूक मला दिसतं आहे. शिक्षणाच्या वाढत्या गुणवत्तेत त्यांच्याकडून होणारं वर्धितमूल्याचं (व्हॅल्यू ॲडिशन) प्रमाण आहे, हे कदाचित त्यांनाही माहीत नसेल. ‘महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा सुधारत आहे,’ असं ठाम विधान आजच्या घडीला मी स्पष्टपणे करू शकतो.

शिक्षण हक्क कायद्याच्या (२००९) पाचव्या प्रकरणातल्या २९ व्या कलमात म्हटलं आहे ः ‘‘जर विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाची निर्मिती करता येईल, अशा रीतीनं वर्गांमधल्या अनुभवांची मांडणी व्हायची असेल तर, शालेय व्यवस्थेत अंगभूत स्वरूपाचे मोठे बदल करावे लागतील.’’
इथं म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात असे बदल होऊ लागले आहेत असं मला वाटतं.
या बदलांचा थोडासा आढावा घेता येईल.
शालेय शिक्षणात, रचनावाद तीन स्तरांवर दृष्टीस पडतो.
एक ः वर्गाच्या, शाळेच्या रचनेत
दोन ः वर्गातल्या शिक्षणप्रक्रियेत
तीन ः शिक्षक-शिक्षिकांच्या मनात
वरील तीनपैकी पहिल्या स्तरावरच्या, म्हणजे शालेय वर्गातल्या-शाळेतल्या रचनेत किंवा व्यवस्थेत, रचनावाद बऱ्यापैकी पसरलेला आहे, असं आज आढळून येतं. अनेक शाळांनी जमिनी हा एरवी शिक्षणप्रक्रियेत न वापरलेला घटक वापरायला सुरवात केली आहे. कित्येकांनी जमिनी शैक्षणिक अंगानं रंगवल्या आहेत. काही खेळ, काही उपक्रम या जमिनीवर बसून विद्यार्थ्यांना आकर्षित करू पाहत आहेत. जे काही रंगवलेले आहे, ते छान दिसत आहे; त्यामुळं शाळेत काही बदल होत आहे, हे शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना-गावकऱ्यांना सहजपणे कळतं. सुरवात म्हणून ही गोष्ट चांगलीच आहे.

शाळांच्या भिंतींवर मात्र वर्तनवादी आणि रचनावादी अशा दोन्ही विचारांना स्थान दिलेलं दिसतं. अनेक तक्ते, सुविचार, माहिती, शासकीय सूचना अशा गोष्टी प्रामुख्यानं दिसून येतात. हा बदलाचा सुरवातीचा काळ म्हणून मानता येईल. भिंतीच्या वापराबद्दल फारसा सयुक्तिक विचार मात्र होत नाही, असं जाणवतं. रचनावादी शिक्षणात जमिनींवर, भिंतींवर कोणत्याही गोष्टी कायमस्वरूपी असू नयेत, असा संकेत आहे. काही गोष्टी रोज किंवा आठवड्याला बदलतील आणि काही गोष्टी महिना-दोन महिन्यांनी. शाळांच्या भिंतींवर बरेचसे फोटो टांगलेले असतात, त्यातले शक्‍य तेवढे काढून टाकले, तर मुलांना अशा जागा त्यांच्या अभिव्यक्तीसाठी उपलब्ध होतील. (शाळेत केवळ शिक्षणतज्ज्ञांचे फोटो - भारतीय आणि पाश्‍चात्य - का लावले जात नाहीत?) इयत्तांनुसार भिंतींवरच्या जागांची वाटणी अर्थातच करता येईल. भिंतींवर काय नसावं, याचबरोबर काय असावं, हे महत्त्वाचं आहे. यासाठी दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे, भिंती हा वर्गवातावरणाचा भाग आहे. त्यामुळं वर्गाच्या शैक्षणिक वातावरणात भिंतींना सामावून घेणं इष्ट ठरतं; तसंच विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी भिंत ही एक सोईस्कर जागा असते आणि भिंतींवरचं आपल्या कामाचं प्रदर्शन हे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित व प्रेरित करणारं असतं.

बाकं हटवून जमिनीवर बसण्याची पद्धत
शासकीय प्राथमिक शाळांमध्ये आणखी एक होत असलेला बदल ठळकपणे लक्षात येत आहे, तो म्हणजे वर्गातल्या बाकांना रजा देऊन मुलांना छोट्या गटांत बसवायला अनेक ठिकाणी सुरवात झाली आहे. कित्येक ठिकाणी, वर्गातून बाकं हलवण्यात काही अडचणी आहेत; पण तिथंसुद्धा बाकं भिंतींशी लावून मध्यभागी मुलांना जमिनीवर बसण्यासाठी जागा मोकळी केलेली आहे. विद्यार्थ्यांनी जमिनीवर छोट्या गटांत बसण्याची पद्धत आता रुळायला लागलेली दिसते. तरीसुद्धा शिक्षकांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी आहे व ती म्हणजे, गट हे त्या त्या वेळच्या अध्ययनाच्या हेतूंनुसार असावे लागतात. गट हे अनेक कारणांनी बदलतही जातात आणि मुख्य म्हणजे गट हे सहकारी शिक्षणाला पायाभूत असल्यामुळं सहकारी शिक्षणातल्या तत्त्वांचीही झालर त्यांना असावी लागते. या दिशेनं शिक्षक-शिक्षकांनी अधिक माहिती घेणं उपयोगाचं ठरेल.

शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग
चौथा महत्त्वाचा आणि सगळीकडं सर्रास आढणारा बदल म्हणजे, आता शाळांतून शैक्षणिक साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात आहे. काही साधनं शासनानं पुरवलेली, काही साधनं शाळांनी विकत घेतलेली, तर काही शिक्षकांनी स्वतः केलेली आहेत. बऱ्याचदा ही साधनं, अन्य ठिकाणी पाहून तशी तयार करून वापरली जात आहेत, तर काही साधनं शिक्षकांनी आपल्या कल्पकतेतून नव्यानं निर्माण केलेली आहेत. उत्साहानं साधने निर्माण होणं वेगळं आणि त्यांच्या निर्मितीमागं काही शास्त्रीय दृष्टिकोन असणं वेगळं. जे साधन आपण वर्गात मुलांसाठी वापरू इच्छितो, त्याचं स्वरूप मुलांना हाताळण्यास सोईचं, सुरक्षित आणि मुलांना आवडेल असं तर असायलाच हवं; पण तेवढंच पुरेसं नाही. शैक्षणिक साधनांची शास्त्रीयता ही त्यांच्या हेतुपूर्ण वापरात आणि हेतुपूर्ण विद्यार्थि-प्रतिसादात असते. साधनाकरवी जे घडवायचं, ते नेमकं व स्पष्ट असलं पाहिजे आणि तसं त्यातून अंतिमतः घडलंही पाहिजे. साधनांबाबत काळजी घ्यायला हवी ती अशी, की साधन हे केवळ आपल्याला काय वाटतं यावर किंवा इतरांच्या ऐकीव अनुभवांवर बेतलेलं असून चालणार नाही. त्यामागचा दृष्टिकोन अशास्त्रीय तर नाही ना, याची शहानिशा होणं आवश्‍यक आहे. साधनं वयानुरूप, शिकण्याच्या घटकांनुरूप, तसंच ती विद्यार्थ्यांना आव्हानरूप वाटतील अशी अर्थातच असायला हवीत. साधननिर्मिती आणि साधनांचा वापर याबद्दल शिक्षकांचंही सातत्यपूर्ण प्रशिक्षण व्हायला हवं. राज्यस्तरावर नवनवीन साधनांची सूची सतत तयार होत जाऊन ती सर्वांना उपलब्ध होत गेली पाहिजे.

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांतून, शालेय रचनेत होत असलेल्या बदलांचं समाधान देणारं स्वरूप आणि त्याविषयी घ्यायची काही शास्त्रस्वरूपी काळजी इथं व्यक्त केल्यानंतर आजच्या बदलाच्या या पायरीवरून आता अधिक वरच्या पातळीवर जाणं गरजेचं आहे.

शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेवर आता लक्ष हवं
आता वर्गातल्या शिकविण्या-शिकण्याच्या प्रत्यक्ष चालणाऱ्या प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करायला हवं. रचनावादातल्या या शिक्षणप्रक्रिया प्रामुख्यानं गेल्या ५०-६०- वर्षांतल्या, विविध शास्त्रांमधल्या सिद्धान्तांमधून उगम पावलेल्या आहेत. नेहमीच शिक्षणपद्धतींचा फार मोठा संबंध त्यामध्ये असणाऱ्या सैद्धान्तिक विश्‍वाशी असतो. १९५० च्या दशकापर्यंत वर्तनवादी सैद्धान्तिक विचारसरणी आणि स्किनर यांच्या स्वेच्छाप्रतिक्रियेच्या (ऑपरंट कंडिशनिंग) तत्त्वाची चलती होती. म्हणजे असं, की तत्कालीन सारा शिक्षणव्यवहार या अशा तत्त्वांना मध्यवर्ती ठेवून बेतला जात असे. तीच विचारसरणी अनेक शाळांतून आजही ठळकपणे अस्तित्वात असलेली दिसून येते. ती बदलणं हेच तर खरं आजच्या शिक्षणक्षेत्रासमोरचं आव्हान आहे. पियाजे यांचं १९६० पूर्वीचं संशोधन व बौद्धिक विकासाच्या पायऱ्यांचं सिद्धान्तन (थिअरी), त्यावर व अन्य शास्त्रीय संशोधनावर आधारलेलं १९६० च्या दशकातलं आकलनशास्त्र, वायगोटस्की यांच्या समाजसाह्याचा विचार, त्यानंतरच्या काळातल्या ब्रुनर यांच्या आकलनविषयक विकासाचा सैद्धान्तिक विचार, १९७० च्या दशकापासून वेग आलेली मेंदूविषयक संशोधनाची मांदियाळी, १९८० च्या दशकांतला रॉबर्ट गॅग्ने यांचा अध्यापनविषयक सिद्धान्त व त्यांचे शिकण्याविषयीचे निष्कर्ष, मेल लेवाईन यांचा चेताविषयक रचनांचा विचार या आणि अशा अनेकांच्या सैद्धान्तिक विचारांनी अध्यापन आणि अध्ययन या वर्गशिक्षणातला मध्यवर्ती संकल्पनांचा चेहरामोहराच पार बदलून टाकला आहे. त्यांना नेमकेपणा देऊन शिक्षणव्यवहारांच्या संदर्भात अधिक स्पष्टता आणण्यात आली आहे. गेल्या शतकभरात सारा शिक्षणव्यवहार वर्तनवादाकडून आकलनवादाकडं आणि तिथून तो ज्ञानरचनावादाकडं वळला आहे.

बदलांमागचं तत्त्वज्ञान आत्मसात व्हायला हवं
महाराष्ट्रातल्या शासकीय शिक्षणातल्या बदलांमागचं हे तत्त्वज्ञान, सिद्धान्तन आणि दृष्टिकोन हा शिक्षकवर्ग व अधिकारीवर्ग यांना पुरेसा आत्मसात होण्याची गरज आहे. त्याशिवाय त्यांच्या हातून घडणाऱ्या शिक्षणप्रक्रियांना शास्त्रीय रूप मिळणे दुरापास्त होईल. आणखी एक गोष्ट अशी, की शिक्षकांनी सैद्धान्तिक विचार आत्मसात करून त्यांची दैनंदिन शिक्षणव्यवहारांशी सांगड घालत गेल्याशिवाय सिद्धान्तन (थिअरी) आणि व्यवहार (प्रॅक्‍टिस) यात आज असलेलं फार मोठे अंतर भरून निघणार नाही आणि अर्थातच शिक्षणात अपेक्षित असलेली उच्च प्रतीची गुणवत्ताही साध्य होणार नाही.

आजवरच्या पठडीबद्ध शिक्षणकेंद्री शिक्षणात सर्वात मोठी उणीव होती ती म्हणजे, शिक्षकांच्या जबाबदारीबाबतची. आजवर शिक्षकांवर केवळ विषय शिकवण्याचीच जबाबदारी होती. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शिकणं ही सर्वस्वी विद्यार्थ्यांचीच जबाबदारी मानली गेली होती. वास्तविक, शाळा ही शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असते. शिक्षकांची नेमणूक व त्यांना दिले जाणारे पगारही विद्यार्थी शिकावेत म्हणूनच दिले जातात. अशा वेळी त्यांनी करायचं काम हे आपसूकच विद्यार्थ्यांच्या शिकण्याशी जोडलं जातं. शालेय प्रक्रियेत विद्यार्थ्यांचं शिकणं महत्त्वाचं असतं आणि ते नीटपणे व सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडेल हे पाहण्याची, ते घडवून आणण्याची अंतिम जबाबदारी शिक्षकांचीच असते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीत असं काही घडवून आणतात की नाही, हे पाहण्याची जबाबदारी केंद्रप्रमुख, विस्तार-अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची असते. या अंगाने या संबंधित मंडळींचं प्रशिक्षण होत राहिलं पाहिजे. वर्गांतल्या शिक्षणप्रक्रिया शास्त्रीय आहेत की नाही आणि विद्यार्थी शिकत जात आहेत की नाही, याची तपासणी तपासनीसांनी प्रामुख्यानं करायची आहे. रचनावादी शिक्षणपद्धतीत हे सोपंही आहे. वर्गात विषयांमधले घटक रचनात्मक पद्धतीनं विद्यार्थ्यांपुढं येत आहेत की नाही आणि सर्व विद्यार्थी एकाग्रतेनं, आनंदानं त्यात भाग घेत आहेत की नाही, हे तरी सुरवातीला पाहणं गरजेचं आहे.

उदाहरणार्थ ः कुणी पाहुणे, अधिकारी वर्गात शिरले तर त्यांना मुलं शिकण्यात रमली आहेत, एकाग्र झाली आहेत, परस्परांशी त्यांचा शैक्षणिक विचारविनिमय चालला आहे, असं दृश्‍य दिसलं पाहिजे. आत्ताच्या सारखं कुणीही, केव्हाही वर्गात शिरो, मुलं उठून ‘गुड मॉर्निंग...’ म्हणतात, त्यांच्या स्वतःच्या कामाचा त्यात अनाठायी वेळ जातो आणि एकाग्रताही भंगते. त्यामुळं अशा औपचारिकता पाळल्या जाणार नाहीत, याची दक्षता शिक्षक, अधिकारी यांनी घेतली पाहिजे.

क्रमिक पुस्तकांचं बदलतं स्वरूप रचनावादाला पूरक
शालेय वर्गांमधले (आणि अगदी महाविद्यालयीन व विद्यापीठीय वर्गांमधलेही!) विद्यार्थी आपणहून शिकण्यास प्रवृत्त होणं ही घटना शिक्षणात मूलभूत आहे. रचनावादी पद्धती ही विद्यार्थ्यांना आनंदानं कृतीयुक्ततेनं स्वयंशिक्षणाला प्रवृत्त करते ही या पद्धतीची जमेची बाजू आहे. आज असंख्य शाळांमधले रचनावादी वर्ग मुलांच्या चेहऱ्यांवर समाधान, उत्सुकता, शिकण्याची ऊर्मी दर्शवत आहेत. याचा अर्थ मुलांना शिकायला आवडत आहे. शाळांचं बाह्य रूपही आकर्षक, सौंदर्यपूर्ण असेल तर विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होतं, हे आता अनेक सरकारी शाळांना आणि त्यांमधल्या शिक्षकांना चांगलं समजलं आहे. शाळा अधिक सौंदर्यसंपन्न व साधनसंपन्न होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पालकवर्ग आणि गावकरी मंडळी शाळा ‘आपली’ मानू लागले आहेत. शाळांच्या आंतर्बाह्य विकासासाठी त्यांच्याकडून भरभरून मदत येत आहे हे शालेय शिक्षणाबाबतची समाजाची मानसिकता बदलत असल्याचं द्योतक आहे.

विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना रचनात्मक शिक्षणाकडं नेण्याचा एक खूप मोठा, जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे तो क्रमिक पुस्तकांच्या बदलत्या स्वरूपांतून. धड्यांखालचे प्रश्‍न काही प्रमाणात वर्तनवादी स्वरूपाचे असले तरी, म्हणजे या प्रश्‍नांची उत्तरं धड्यांमध्येच आहेत अशी असली, तरीही त्याचबरोबर मुलांना शोध घ्यायला लावणारे आणि कृती करायला लावणारे असेही प्रश्‍न आले आहेत. शिक्षकांनी त्यांचं नीटस पालन केलं तरी मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक सघन होईल.

वर्गखोल्यांबरोबरच जीवनव्यवहारातूनही शिक्षण
शासनाने क्रमाक्रमानं दरवर्षी क्रमिक पुस्तकं नव्यानं तयार केली. त्यात एक वैचारिक प्रवाहीपणा दिसून येत आहे. क्रमिक पुस्तकांचं स्वरूप अधिकाधिक रचनावादी शिक्षणाच्या अंगानं बदललं जात आहे. नुकतीच आलेली सहावीची पुस्तकं याच मालिकेत पुढचं पाऊल टाकणारी आहेत. या पुस्तकांमधून विषयांतल्या घटकांना भिडणारे पाठ तर आहेतच; परंतु मुलांना केवळ पाठातच गुंतवून न ठेवता, त्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक कृतींकडं वळवण्याचा आणि त्याकरवी वर्गाबाहेरच्या समाजजीवनाशी जोडण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानं मुलांच्या शिकण्यासाठीचा परिसर वर्गखोल्यांपुरता मर्यादित न राहता त्यांचं अंगणच विस्तारलं आहे. मुलांचं शिक्षण केवळ वर्गांमधून न होता ते आता काही प्रमाणात बाह्य जीवनव्यवहारांतून व्हावं, असा प्रयत्न यात करण्यात आलेला आहे. हे रचनात्मक शिक्षणाचं पडलेलं पुढचं पाऊल आहे.

विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची जोड
आजवरचं शालेय शिक्षण नैतिक आणि नागरिकत्वाच्या मूल्यांबाबत उदासीन होतं आणि ही शालेय शिक्षणामधील फार मोठी उणीव होती. मूल्यशिक्षणाची सामाजिक जाणीवही फारशी व्यक्त होत नव्हती. शासकीय स्तरांवरून याबाबतचे काही विचार व्यक्त होत होते, काही तुटक आणि त्रोटक प्रयत्नही केले जात होते; पण शाळांमधून ते फारसे गंभीरपणे कधी घेतले गेले नाहीत आणि शिक्षकवर्गानंही ते आवर्जून मनावर घेतले नाहीत. त्यामुळं, क्षमताधिष्ठित शिक्षणाचा प्रयत्न झाला; पण मूल्याधिष्ठित शिक्षणाला वर्गाबाहेर समाजावरच सोपवलं गेलं.

आता आलेल्या सहावीच्या क्रमिक पुस्तकांनी एक मोठा प्रयोग हाती घेतला आहे, असा निष्कर्ष मला काढावासा वाटतो. हा प्रयोग म्हणजे, विषयशिक्षणाला नागरिकत्वाच्या मूल्यांची दिलेली जोड होय. भाषांच्या पुस्तकांमधून हे ठळकपणे प्रत्ययाला येत आहे.

मूल्यवर्धन ः रचनावादी शिक्षणपद्धतीचं पुढचं पाऊल
महाराष्ट्र शासनानं याचबरोबर आणखी एक महत्त्वाकांक्षी आणि जीवनोपयोगी निर्णय घेतला आहे आणि येत्या जूनपासून, म्हणजे जून २०१६ च्या नव्या शालेय वर्षापासून, मूल्यवर्धनाचा नवा कार्यक्रम शाळांमधून सुरू होत आहे. महाराष्ट्र शासनाचा हा कालोचित कार्यक्रम महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यांमधल्या प्रत्येकी एका केंद्रपातळीवरच्या शाळांमधून पथदर्शी स्वरूपात होणार आहे. बीड जिल्ह्यांतल्या सुमारे ५०० शाळांतून हा मूल्यवर्धनाचा प्रयोग गेल्या सात वर्षांपासून हाताळला जात आहे. रचनावादी पद्धतीच्या शिक्षणानं, मुलांच्या मुक्त वातावरणातल्या शिकण्याला एकीकडं उठाव येईल, मुलं स्वयंशिक्षणाला उद्युक्त होतील, ती ‘शिकणं’ या हेतूनंच शिकतील, तर दुसरीकडं अनुभवाधारित मूल्यवर्धनाच्या कार्यक्रमांतून ती अधिक विचारपूर्वक वागायला शिकतील. या पद्धतीनं भारतीय राज्यघटनेतली पायाभूत नागरी मूल्यं, भावी समाजाच्या दैनंदिन व्यवहारांत उतरतील, अशी आशा आपण करू शकतो.

आजच्या शिक्षणानं नेहमीच उद्याच्या जीवनाची घडी घालून द्यायची असते. मुलांच्या शिकण्या-वागण्याला वळण देऊनच हे साध्य होण्यासारखे असतं. महाराष्ट्रात या दिशेनं पडू लागलेली दमदार पावले, उद्याच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त  .

भाग 2

रचनावादी शिक्षणाच्या तीन पायऱ्या

रचनावादी शिक्षणाच्या तीन पायऱ्या

२२ जून २०१५चा शासननिर्णय हा शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यावर मुलांच्या शिकण्याची जबाबदारी टाकत आहे.

रमेश पानसे | June 30, 2016 4:43 AM
ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शासनाने रचनावादी शिक्षण पद्धती काही जिल्ह्य़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर  सुरू केली  आहे. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांना प्रामुख्याने दिली आहे. नव्या स्वयंअध्ययन पद्धतीमुळे ही योजना यशस्वी होऊ शकेल , हे सुचवणारा लेख.

२२ जून २०१५चा शासननिर्णय हा शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्यावर मुलांच्या शिकण्याची जबाबदारी टाकत आहे. परिणाम असा होत आहे की, आज शाळांच्या वर्गातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आणि कित्येक शिक्षकांच्या मनातून उत्साहाचे वातावरण दिसत आहे. हा उत्साह, हा आनंद काही तरी सतत करण्याचा आहे, आपापल्या करण्यामधून काही तरी चांगले होत जाण्याचा आहे. महाराष्ट्रातल्या सरकारी शाळांमधून दिसणारे हे वातावरण पाहिले की, जीवनाचा एक मूलमंत्र हाती लागतो, तो म्हणजे माणसाचा आनंद सतत काही तरी नवेनवे करण्यात आहे, न करण्यात नाही आणि याला मेंदू संशोधनाचा बळकट आधार आहे.

या निर्णयाने आजवर राहून गेलेली अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आहे, ती म्हणजे आजवर शिक्षकांवर केवळ शिकविण्याची जबाबदारी दिलेली होती. मुलांच्या शिकण्याची जबाबदारी शिक्षकांवर नव्हती तर ती मुलांवरच होती आणि शिकविण्यात शिक्षकांचे यश सामावलेले नव्हते. मुले शिकणे यातच शिक्षकांचे यश आहे आणि हे यश आपण थोडय़ाफार प्रमाणात घेऊ लागलो आहोत, कारण २२ जूनच्या शासननिर्णयाने, मुलांच्या शिकण्याची जबाबदारी शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांना प्रामुख्याने दिली आहे.

याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रात जिल्हा परिषदांच्या शाळांच्या स्तरावर काय घडते आहे ते पाहू. निदान चार गोष्टी तरी माझ्या अवलोकनात आल्या आहेत. एक- मुलांना आपणहून शिकायला संधी देणारी अशी रचनावादी शिक्षणपद्धती बऱ्याच जणांना एकूण आणि काही लोकांना थोडय़ाफार प्रमाणात माहीत झाली आहे. दोन- काही शिक्षक व अधिकाऱ्यांनी कुमठे बीट, वाई किंवा ग्राममंगलच्या पालघर जिल्ह्य़ातील शाळा प्रत्यक्ष पाहून तेथील काही ठळक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. तीन- कित्येक शिक्षकांनी स्वत: प्रेरित होऊन आपापल्या शाळांत रचनावादी शिक्षण आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चार- आज हजारो शाळांमधून रंगविलेल्या जमिनी, रंगवलेल्या भिंती, वर्गातून हलविलेली बाके आणि भरपूर शैक्षणिक साधनांची मांडणी या सहज करता येण्याजोग्या गोष्टी मोठय़ा हिरिरीने केल्या आहेत. शिक्षण परिवर्तनाची नांदी झाल्याच्या या खुणा आहेत.

रचनावादाच्या मार्गावरील ही केवळ पहिली पायरी आहे. दुसऱ्यांचे पाहून तसे आपण करण्याला खूपच मर्यादा असतात. ती कॉपी होते. त्यातून वर्गाचे बाह्य़ रूप बदलते, आपली बदल करायला तयारी आहे, हेही इतरांना जाणवते आणि शाळेत काही चांगल्या दिशेने बदल होतोय, हे पालकांनाही कळते. गावकऱ्यांनाही कळते.

पहिल्या पायरीच्या कामाचा हा उपयोग जो होतोय तो दुसऱ्या पायरीवर चढण्यासाठी आपली मानसिक तयारी करून देणारा आहे म्हणून तो स्वागतार्ह आहे; पण या पहिल्या पायरीवरून वरच्या दुसऱ्या पायरीवर चढायचे आहे, याचे भान सर्व शिक्षकांनी ठेवणे आवश्यक आहे.

दुसरी पायरी आहे ती प्रत्यक्ष वर्गामधील शिक्षणप्रक्रिया समजावून घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करण्याची. रचनावादी शिक्षणाची दोन पायाभूत तत्त्वे आहेत. एक विद्यार्थी स्वत:च्या ज्ञानाची रचना स्वत: करीत असतो, म्हणजे स्वत:चे स्वत: शिकत असतो आणि दुसरे तत्त्व असे की, मुले कृतीतून म्हणजे करून अधिक चांगले शिकतात. याच्या आधारे मी रचनावादाची एक सगळ्यात छोटी व्याख्या केली आहे. ‘कृतिशील स्वयंशिक्षण म्हणजे रचनावादी शिक्षण होय.’ याच्या आधारे आपण एक व्यावहारिक नियम करू या. आपण असे म्हणू या की, शालेय वर्गात कृतिशील स्वयंशिक्षण होत राहिले पाहिजे.

वर्गात विद्यार्थिनी शिकत असेल तर तिला चार प्रकारचे संबंध सांभाळावे लागतात. एक- शिक्षिकेशी असलेला संबंध, दोन- इतर सहाध्यायी मित्र-मैत्रिणींशी जोडलेला संबंध, तीन- अभ्यासक्रमाशी, त्यातील विषयांशी, विषयातील आशयाशी असलेला संबंध आणि चार- वर्गातील व शाळेतील वातावरणाशी असलेला संबंध. यापैकी पहिले दोन मानवी संबंध असून दुसरे दोन भौतिक व पर्यावरणीय संबंध आहेत. या चारही संबंधांकडे ती शिकणारी विद्यार्थिनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहते, यावर तिच्या शिकण्याच्या प्रक्रियेची प्रत किंवा दर्जा आणि शिकण्याचे प्रमाण अवलंबून असते.

१. विद्यार्थी-शिक्षक संबंध

शिक्षकाच्या वर्गातील आवाजात मार्दवता आहे की कठोरता, शिक्षक प्रेमाने वागतो की धाक दाखवतो, शिक्षा करतो; शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मदत करतो की फक्त काही थोडय़ांनाच, शिक्षक सातत्यपूर्ण (व विद्यार्थ्यांच्या नकळत) मूल्यमापन करतो की परीक्षा (मुख्यत: लेखी) घेतो; शिक्षक विद्यार्थ्यांना हालचाल करण्याचे- बोलण्याचे स्वातंत्र्य देतो, की शिस्तीत जखडून किंवा ओळीत व बाकांत बांधून ठेवतो. शिक्षक मुलांना शिकण्यास पुरेसा अवकाश देतो, की आपल्याच वेगाने शिकवीत राहतो, अशा एक ना अनेक शिक्षकांच्या वागण्याशी संबंधित असलेल्या बाबींवर विद्यार्थिनीचा शिकण्याचा दृष्टिकोन वर्गात शिकण्याबाबत अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे ठरत असते.

२. विद्यार्थी-विद्यार्थी संबंध

रचनावादी शिक्षण व्यवहारात, विद्यार्थी-विद्यार्थी संबंधाला अनिवार्य स्थान प्राप्त झाले आहे. विद्यार्थी परस्परांच्या संपर्कातून, संवादांतून, विश्वासातून, मैत्रीतून आणि परस्परांच्या साहाय्यांतून उत्तम रीतीने शिकतात हे आता अनेकांना प्रत्यक्ष अनुभवातूनच दिसून आले आहे; परंतु अशा परस्परसंबंधातून केवळ शिकणेच चांगले होते असे नाही. ते तर होतेच, पण यातूनच विद्यार्थ्यांची सामाजिकता विकास पावते. त्यांच्यात हळूहळू सहकाराचे मूल्य विकसित होते.

रचनावादी शिक्षणातील, वर्गामधला विद्यार्थी-विद्यार्थी संबंध कसा निर्माण करायचा, कसा जोपासायचा, कसा टिकवायचा आणि कसा वृद्धिंगत करायचा याचे शास्त्रशुद्ध शिक्षण प्रत्येक शिक्षक-शिक्षिकेचे होणे गरजेचे आहे. हे शिक्षण अर्थातच शिक्षक-शिक्षक असे परस्परसंबंध बांधून, परस्परांच्या संवादांतून, शिक्षक आपले आपणच घेऊही शकतील.

३. विद्यार्थी-अभ्यासक्रम संबंध

आपण पाहिलेली आजवरची क्रमिक पुस्तके ही प्रामुख्याने वर्तनवादी विचारसरणीची सैद्धांतिक पाश्र्वभूमी राखून तयार झालेली होती; परंतु रचनावादी शिक्षण पद्धतीच्या सार्वत्रिक स्वीकारानंतर या क्रमिक पुस्तकांचे स्वरूप अधिकाधिक या दिशेने करण्याचा प्रयत्न शासनातर्फे होत आहे. नुकतेच आलेले सहावीचे क्रमिक पुस्तक हे याच प्रयत्नांचे द्योतक आहे. अभ्यासक्रमातील संकल्पना समजावून घेणे, अभ्यासक्रमातील अधिक वरचे घटक शिकण्याचे आव्हान घेणे, विविध घटक करून, अनुभवून शिकणे आणि त्याचबरोबर शिकले त्याची लिहून, बोलून, नाटय़ीकरण करून, उपयोगात आणून अभिव्यक्ती करण्याची संधी घेणे अशा प्रकारे अभ्यासक्रम व विद्यार्थी यांचे नाते घट्ट बांधलेले असते. शिक्षकांना, हे नाते समजावून घेणे, प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला शिकण्याच्या विविध प्रकारच्या संधी देऊन, अभ्यासक्रमाचे शिकणे विद्यार्थ्यांच्या स्वयं-शिक्षणाशी जोडणे अशा गोष्टी नव्याने करायला हव्यात. यासंबंधीचे नवे शास्त्र विकसित करायला हवे आहे.

४. विद्यार्थी-वातावरण संबंध

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणारा भोवतालचे वातावरण हा एक प्रभावी घटक आहे. शाळेचे वातावरण बंदिस्त, लादलेल्या कमालीच्या शिस्तीचे, घोकंपट्टीचे, गृहपाठाचे, लेखी परीक्षांचे, शिक्षेचे, स्पर्धा- बक्षिसाचे आणि धाकाचे, भीतीचे, कंटाळ्याचे, उदासीनतेचे अशा प्रकारचे असेल तर मुलांचे शिक्षण नीट होत नाही; परंतु आपल्या पिढय़ान्पिढय़ांचा याच प्रकारच्या शिक्षणाचा अनुभव आहे. रचनावादी शिक्षणाचे आगमन झाले आहे तेच मुळी हे वातावरण बदलण्यासाठी.

नवे शिक्षण विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्यांना नवनवे अनुभव मिळण्यासाठी व काही करायला मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेरच्या जगात न्यायला हवे. आजूबाजूच्या समाजजीवनाशी त्यांचा संपर्क व संवाद व्हायला हवा. शिक्षणात अशा वर्गबाह्य़ अनुभवांचे वयोमानानुसार भिडणे, हा रचनावादी स्वरूपाच्या शालेय शिक्षणाचा एक अविभाज्य भाग आहे.

शिक्षणात अशा वर्गबाह्य़ अनुभवांचे तीन अगदी ठळक असे फायदे आहेत. पहिला फायदा असा की, त्याने पूर्वज्ञानाची विस्तारित बैठक तयार होते आणि ती नवे काही शिकायला उपयुक्त ठरते. दुसरा फायदा असा की, त्याने अनुभवांधारित अशा भावी जीवनाची तयारी करून दिली जाते आणि तिसरा दैनंदिन वर्गजीवनाशी संबंधित असा फायदा कोणता असेल तर तो म्हणजे विद्यार्थी शिकण्याच्या प्रक्रियेत रमतात, रमतात म्हणून एकाग्र होतात, एकाग्र होतात म्हणून कायमस्वरूपी शिकतात. शिवाय मुले अधिक चांगला विचार करायला शिकतात, त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि भाषाशक्ती विकसित होत जाते. शिक्षणाचे हेच तर उद्दिष्ट असते. रचनावादाच्या या तीन अवघड पायऱ्या चढून गेले तर शिक्षकांनी आपल्या कर्तव्याचा आणि कर्तृत्वाचा गड जिंकला असे म्हणता येईल!



रमेश पानसे 
लेखक गेली अनेक वर्षे शिक्षण चळवळीत कार्यरआहेत.

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता